भारतीय लष्करी इतिहासात आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा आहे. वायूसेनेने पहाटे साडेतीनच्या सुमारास हवाई हल्ले करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी संघटनांची ठाणी, दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक यांचा खात्मा करून टाकला. आज सकाळी ही बातमी आली आणि देशभरातील वातावरण एकदम बदलून गेले. बारा दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला करून पाकने आगळीक केली होती. यात साठहून अधिक जवान शहीद झाले होते. या पाश्वभूमीवर भारतीय लष्कर भूमिका घेणे अपेक्षित होते. त्यानुसार हवाई दलाने पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून आपली लष्करी सिध्दता संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. आजची ही कामगिरी अभिमानास्पद आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या सत्तर वर्षात तीन युध्दे झाली. या तीनही युध्दात भारतीय सैन्य आणि ताकद जगाला दिसली आहे. विशेषत: 1971च्या बांग्लायुद्धात पाकने सपाटून मार खाल्ला. यानंतर छुप्या युद्धाचा आधार घेत दहशवादी संघटना मार्फत भारता विरुद्ध युद्ध सुरू ठेवले. 1980 नंतर सातत्याने हे उद्योग पाक करत आले . यास पाक लष्कराची मोठी साथ मिळाली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना शेफारुन गेल्या आहेत. पाक मध्ये मुलकी प्रशासन हे नावापुरते राहिले आहे. सतत लष्करी बंड आणि हुकुमशाह हे पाक मध्ये पाचवीला पुजले आहेत. पाकमध्ये लोकशाही प्रक्रिया उभी राहू शकलेली नाही. सध्या ईम्रान खान हे सत्तेत आहेत, ते ही लष्कर प्रभावाखाली वावरताना दिसत आहेत. त्यांच्याकडून दहशतवादी संघटनांचा बंदोबस्त होणार नाही. त्यामुळे अशा संघटनांचा उन्माद वाढत जाईल. पाकमधील सामान्य लोक हे अंतर्गत आणि बाह्य गोष्टींना कावून गेले आहेत. ते भविष्य बदलू शकतात. यातून अंतर्गत यादवीची शक्यता नाकारता येत नाही. भारताने याचा सखोल अभ्यास करून योग्य भूमिका घेणे उचित होईल.
आजच्या वायुसेनेच्या कारवाई नंतर पाक आणि तेथील दहशतवादी संघटना या अधिक आक्रमक बनतील. त्यांना चुचकारण्यासाठी पाक मधील राज्यकर्ते कोणतेही धाडसी पाऊल उचलू शकतात आणि तो आजपर्यंतचा बोलका इतिहास आहे. आपल्याकडे निवडणुका येऊ घातल्या आहेत. आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राफेलचा मुद्दा राजकीय रिगणात आलेला आहे. भाजप- कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकावर राळ उडवित आहेत. या परिस्थितीत सामुहिक सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे महत्व असाधारण आहे. हा राजकारणाचा मुद्दा होऊ नये. हे भान सांभाळून या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. विशेषत: समाज माध्यमांचा काळजीपूर्वक वापर व्हावा.
डॉ. संजय रत्नपारखी.