बुधवार, २५ मार्च, २०२०

गतीच्या आशिर्वादाची पंच्चेचाळीस वर्षे !

     वारणानगर मध्ये बालपण गेले. माझे पूर्व प्राथमिक शिक्षण वारणा विद्या मंदिर मध्ये झाले. वारणा साखर कारखान्याने शिक्षण मंडळ स्थापन करून ही शाळा सुरु केली होती. शाळा ही तशी साधीच. शाळेपुढे एक पटांगण होते. याच मैदानावर झेंडावदन कार्यक्रम होत व्हायचा.  मी १९७२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे भाषण याच मैदानावर ऐकले होते. एरवी कार्यक्रम नसत त्यावेळी मुले खेळत राहत. अनेक माझ्या समवयस्क मुला मुलींनी याच मैदानावर सायकल शिकून घेतली. मला मात्र याचा हेवा वाटायचा.

   माझ्या बरोबरची अनेक मुले-मुली सायकल शिकून घरी काही तरी मदत करत. मला छोटी कामे करावी लागत. परंतु मात्र ती चालत जावून करावी लागत. मी अधून मधून सायकल शिकण्याचा प्रयत्न करीत आहे, वडिलांच्या लक्षात आले. ऐकेदिवशी वडिल सायकल वरून मला घेऊन शाळेच्या मैदानात आले. मैदानात इतर मुले सायकल चालवत होते. वडिलांनी मला सायकल मध्ये पाय घालून पायंडल मारायला सांगितले. मी प्रयत्न करीत होतो.परंतु पायंडलवर पुरेसा दाब पडत नव्हता. मी दोन चारवेळा प्रयत्न करून पाहिला. शेवटी वडिलांनी मागे धरून मला पायंडल मारण्याची सूचना केली. मी पायाने दाब वाढवत नेला आणि सायकल पुढे निघाली तसे वडिलांनी मागील आधार सोडला. शेवटी परिणाम असा झाला की, तोल जावून खाली पडलो. गुढघ्यावर खरचटून रक्त बाहेर आले. हातावर पडलो त्यामुळे वेदना जाणवू लागली. वडिल मला लगेचच शेजारी कारखान्याच्या दवाखान्यात घेऊन गेले. जखम पाहून त्यावर ड्रेसिंग केले गेले. घरी आल्यावर दुखणं थांबले नाही. आईला काळजी वाटली. एवढ्या लहानमुलाला सायकल शिकवू नका,असे तिने बाबांना सांगितले.

 चौथीला जाईपर्यंत वडिलच मला सायकलवर अनेक ठिकाणी घेऊन जात. मी मात्र पुढील नळीवर टाँवेल टाकून बसत राही. आपल्याला ही सायकल आली पाहिजे, हे मनोमन वाटायचं. हे आठवलं की, जखम आठवली जायची. शाळेत दरवर्षी गुढीपाडव्याला सरस्वती पूजन असायचे. मी पाडव्याच्या दिवशी पाटीवर सरस्वती काढून आणि पूजा साहित्य घेऊन शाळेत गेलो. वर्गशिक्षिका मालती गुणे मँडमनी सरस्वती पूजा का करायची ,हे सांगून पूजन करुन घेतले. सर्व मुलांना त्यांनी कडुनिंबाची पाने आणि नंतर गूळ खायला सांगितला. एक तासात शाळा सुटली. घरी आल्यावर काही वरिष्ठ गल्ली मित्र  सायकली चालवत होते. यापैकी काहींनी सायकल घेऊन ये, असे सुचविले. मी वडिलांना न सांगता सायकल घेऊन चालत मागे गेलो. माझे मित्र हे  वारणा कारखान्याच्या मुख्य दरवाजा जवळ जावून थांबले. रस्ता डांबरी आणि थोडा सखल होता. यावर त्यांनी सायकल स्पर्धा लावली. मी मात्र यात सहभागी होत नव्हतो,त्यांच्याही लक्षात आले. एका मित्राने मला नळीच्या मधल्या भागात पाय ठेवून उभे केले. शर्यत सुरू झाली आणि वाकबगार मित्र ती जिंकण्यासाठी जोरात सायकली चालवे लागले. मी पुन्हा एकदा पायंडलवर पाय देवून दाब वाढविला. सायकल पुढे निघाली. अर्धा पायंडल मारत सायकल अर्धा कि.मी पुढे गेली. माझे मित्र आश्चर्यकित झाले. मला पुन्हा उलट दिशेला नेऊन सायकल चालवायला सांगितले. मी त्याच मार्गावर सायकल चालवत घरी आलो.

वडील सायकल शोधत होते आणि मी अर्धा पायंडल मारत सायकल चालवत घरी येत आहे, हे त्यांना पाहून आनंद झाला. आठदिवसात फूल पायंडल आणि महिन्यात शीटवर बसून सायकल चालवायला लागलो. आज या घटनेला पंच्चेचाळीस वर्षे झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा गतीचा आशिर्वाद मला देऊन गेला. मी वाहनांच्या घोळक्यात सायकल अधिक जवळची मानतो. याच सायकलने गती दिली. कोडोली हायस्कूल मधील शिक्षणात सायकल नेहमी बरोबर राहिली. आता मुंबई वास्तव्यात सायकल फिटनेस आणि व्यायामासाठी मदत देत आहे. आज गुढीपाडवा असल्याने जुनी आठवण जागृत झाली.
डॉ. संजय रत्नपारखी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा