सोमवार, २० एप्रिल, २०२०

सांस्कृतिक संचित


    वारणा सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९५९ मध्ये झाल्यानंतर अवघ्या दहा एक वर्षात वारणानगर वसाहत आणि तेथील विविध उपक्रम समाजासमोर यायला सुरुवात झाली. कारखान्याचे चेअरमन तात्यासाहेब कोरे आणि कार्यकारी संचालक नंदकुमार नाईक यांचे वारणा उपक्रम वाढविण्यासाठी मोठे योगदान होते. वारणानगर हे साठच्या दशकानंतर आकाराला येताना आर्थिक, सामाजिक बदल घडून आले. सांस्कृतिक बदलांनी या वसाहतीस आणि आसपासच्या गावांना अभिरुची संपन्न करण्यास मदतच केली.

    वारणानगच्या सांस्कृतिक जीवनात दरवर्षी काही टप्पे ठरलेले असायाचे. वारणा साखर कारखान्याचा गणेशोत्सव खूप मोठा राहायचा. गावात मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिर होते. दरवर्षी हनुमान जयंती ही धार्मिक पध्दतीने साजरी करताना एकदा नामांकित शास्त्रीय गायक मंदिरात रागदारी करुन जायचा. यानिमित्ताने मोठ्या गायकाची गायकी फार जवळून पाहता आली. याचबरोबर दरवर्षी १ आँगष्ट ते ७ आँगष्ट या काळात 'वर्षा व्याखानमाला' व्हायची. यात नामवंत वक्ते, अभ्यासक यांची व्याख्याने आयोजित केली गेली. यासर्व गोष्टी आकाराला येताना कार्यक्रम आयोजनासाठी दोन जागा कायमस्वरूपी निश्चित झाल्या. एक म्हणजे लालबहादूर शास्त्रीभवन आणि दुसरे म्हणजे दवाखान्यासमोरील मोकळे मैदान.

   वारणा साखर कारखाना गणेशोत्सव हा प्रथम शुगरहौस मध्ये धार्मिक कार्यक्रम ,तर शेजारील मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. शुगरहौस मध्ये एकदा मोठा देखावा, श्रीची आकर्षक मूर्ती हे एक मोठे आकर्षण राहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक नाटके व्हायची. मुंबईहून व्यावसायिक कंपन्याची नाटके ही मोठी मेजवानी राहायची. किमान दोन संगीत नाटके यात पाहायला मिळायची. याचबरोबर स्थानिक कलाकारही दरवर्षी दोन नाटके प्रयत्नपूर्वक सादर करीत. नाट्यसंपदाची बहुतेक सर्व नाटके मोकळ्या मैदानात सादर झाली. नाटके पाहायला गर्दी मोठी व्हायची.त्यात पाऊस ही हजेरी लावायचा. कार्यक्रमाचा हिरमोड होऊ नये, म्हणून ताडपत्री टाकून मांडव घातला गेला. याच अशा मांडवात 'तो मी नव्हेच' चे दोन प्रयोग झाले,यातील एक प्रयोग महिला आणि मुले तर दुसरा प्रयोग हा पुरुषांच्यासाठी सादर झाला होता. यात एक लोकनाट्य व्हायचे. हे पाहण्यासाठी आसपासच्या गावांतून मोठ्या संख्येने लोक यायचे. वाढती गर्दी आणि काँलनीतील सुरक्षितता विचारात घेऊन जागा बदलली गेली. दवाखान्यासमोरील मैदान हे याचे मानकरी ठरले. १९७६ पासून गणेशोत्सव कार्यक्रम याच मैदानावर झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्र पाच दिवसांची व्याख्यानमालेची सुरुवात याच मैदानात झाली होती. गणेशोत्सवात कुस्त्यांची दंगल याच मैदानावर झाली आहे. अधूनमधून सत्कार समारंभ, विविध खेळ, जाहीर सभा, अधिवेशने याचे साक्षीदार असलेले हे मैदान आता पन्नाशी पूर्ण करेल. मी वारणा विद्यामंदीर मध्ये शिकत असताना हे मैदान फारसे वापरात येत नव्हते. शाळेची मुले, शिक्षक यांची ये जा याच मैदानातून व्हायची. गणेशोत्सव कार्यक्रम येथे स्थलांतरित झाला आणि मैदानाचे महत्त्व वाढत गेले.

   वारणानगर आकाराला येत असताना मध्यम कार्यक्रम आणि सादरीकरणासाठी बंदिस्त हाँल नव्हता. ही गरज विचारात घेऊन वारणा विद्यामंदिर जवळील एका प्रशस्त जागेत आणि मुख्य रस्त्यावर लालबहादूर शास्त्रीभवन हे उभारले गेले. तत्कालिन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते दि. २०-१०-१९७० रोजी याचे उदघाटन झाले. यावर्षी शास्त्रीभवनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हा हाँल उभा राहण्यापूर्वी मोकळी जागा होती. या जागेवर कारखाना शेतीतील मळणीची कामे काही काळ चालायची. शेजारी एस.टी.स्टँड असल्याने त्यावेळच्या हिशोबाने वहातूक दिसायची. पश्चिमेला कोडोली आणि पूर्वेकडे वडगांव आणि कोल्हापूरला जाणाऱ्या एस.टी.बसेस, ट्रक यांची ये जा होती. शास्रीभवन झाले आणि या जागेचे रूपच पालटून गेले. समोरच्या मोकळ्या जागेत हिरवळ लावून सुशोभीकरण केले होते.यावर सायंकाळी किंवा सुट्टी दिवशी मुले खेळ खेळत. कालांतराने इमारतीच्या उत्तर बाजूस बरीच रिकामी जागा होती, तेथे झोपाळे,घसरगुंडी उभी करून लहान मुलांना बागडण्यासाठी पार्क उभा केलेला होता.त्यामुळे लहान मुले आणि पालक यांची वर्दळ तेथे दिसायची. छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक समरंभास जून १९७४ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम झाले. हे औचित्य साधून याच वास्तू परिसरात रायगड किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिमा उभा केली होती.

   शास्त्रीभवन हा बहुउद्देशीय हाँल असल्याने, शाळेतील परीक्षेपासून लग्नकार्य, सिनेमे, नाटके, गँदरिंग, व्याख्यानमाला, वाचनालय, संस्थाच्या वार्षिक सभा, सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रयासाठी वापरला जात असे. शेजारी वारणा विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा होती. यातील लहान गट मागील बाजूस भरवले जात. माझ्या काही वार्षिक परीक्षा याच इमारतीच्या मुख्य हाँल मध्ये झाल्या. वारणानगर मध्ये सिनेमा थिएटर नव्हते. वारणा कामगार सोसायटीने याच इमारतीत एक प्रोजेक्टर बसवून काही वर्षे सिनेमे दाखविले. बहुधा जुने हिंदी आणि मराठी सिनेमे असत. ते फक्त बुधवार, गुरुवारी असे दोनच दिवस पाहायला मिळायचे. त्यावेळी रिळाची पेटी एस.टी.ने वारणेत येई. सोसायटीचा हमाल ती हातगाडीवर घेऊन जाताना दिसला की, काँलनीत खेळ खेळणाऱ्या मुलांचे चेहरे उजळून सिनेमा कोणता आहे, याबद्दल त्यांची उत्सुकता ताणली जायची. बुधवार किंवा गुरुवारी दुपारी मुख्य चौकात चित्रपटाचा फलक आणि मध्यम पोस्टर झळकलेले दिसे. आम्ही मुलांनी येथे अनेक चित्रपट पाहिले. भालजी पेंढारकर यांचा छ.शिवाजी महाराजांवरील ' मराठा तितुका मेळवावा' हा चित्रपट तर सलग पंधरा चालवून आसपासच्या परिसरातील शाळांना हा दाखविला होता.राजेश खन्नाचा 'हाथी मेरे साथी' आणि मेहमूदचा ' बाँम्बे टू गोवा' हे चित्रपट येथे पाहिल्याचे स्मरणात आहे. शास्त्रीभवन मध्ये बँडमिटन कोर्ट होते.यात काही लोक सायंकाळी बँडमिटन खेळत. याशिवाय प्रवेशद्वार शेजारी शारदा वाचनालय होते. सभासद फी दरमहा पाच रूपये घेऊन ते सुरू झाले. रोजची मराठी दैनिके, साप्ताहिके, कादंबऱ्या, कथासंग्रह अशी पुस्तके वाचकांना मिळत. मी रोज सायंकाळी मुंबईची वर्तमानपत्रे येथे वाचत असे.

उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे आँगष्ट ७७ पासून शारदा वाचनालय आणि वारणा साखर कारखाना यांनी वर्षा व्याखानमाला सुरू केली, जी आजही सुरु आहे. या व्याखानमालेच्या निमित्ताने खूप मोठे वक्ते, अभ्यासक, ऐकायला मिळाले. प्राचार्य शिवाजीराव भोसले, अनिल अवचट, डॉ.नरेंद्र दाभोलकर, द.मा.मिरासदार, डॉ.निर्मलकुमार फडकुले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, राम कापसे, आचार्य शांताराम गरुड, यशवंतराव मोहिते, डॉ. अंबादास माडगूळकर अशी सहज नावे आठवतात. या व्याख्यानमालेत प्रास्ताविक आणि परिचय करून देण्यासाठी प्राचार्य सत्यशील पोंदे, प्रा.सुरेश शिरोडकर, डॉ. मुकुंद दातार हे उत्तम भूमिका निभावत असत.

   शास्त्रीभवन वापरात तशी लवचिकता होती. याच जागेत जागतिक किर्तीचे रघुवीर जादूगार यांचा प्रयोग पाहता आला. शरद तळवलकर यांच्या 'सखी शेजारीन' नाटकाचा आणि काळूबाळू यांच्या लोकनाट्याचा व्यावसायिक प्रयोग तिकीट लावून हाऊसफुल्ल झाले होते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारणानगरला बाहेरची सतत येत त्यांचे स्वागत समारंभ येथेच झाले. यशवंतराव चव्हाण यांचे अखरेचे भाषण याच हाँल मध्ये १९८१ मध्ये झाले होते. सत्ता हातात नसली की, लोकही किती लांब जातात ,याचे यथार्थ दर्शन सत्कारात दिसले होते. वसंतरावदादा पाटील हे खासदार असताना अशाच एका लग्नासाठी शास्रीभवन मध्ये आले होते. लग्नासाठी बँन्ड पथक हे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रक गावातील होते. विशेष म्हणजे एका अंध व्यक्तीने हा बँन्ड उभा केला होता. त्याचे नाव ऐकून दादांनी लग्न समारंभ आटोपल्यावर दोन गाणी ऐकून पथकाचे अभिनंदनही केले होते.

 नोकरी निमित्ताने गाव सोडून तीन दशके पूर्ण झाली. कामा निमित्ताने महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध विभागात जात असताना विविध कला, नाटके पाहायला मिळत गेली. या कलांचा आस्वाद घेताना आपल्या सांस्कृतिक संचिताची आठवण येते. तुलना होते आणि आपण रसिक म्हणून आधीच घडत होतो,याची जाणीव होते. अशा असंख्य आठवणी जागवत काळ पुढे सरकत आहे. वारणानगर मधील किमान दोन पिढ्यांचे सांस्कृतिक संवर्धन या दोन जागांनी केले आहे. मी आणि माझे सर्वसमकालीन मित्र मात्र हा वारसा सांभाळून आहोत.
डॉ. संजय रत्नपारखी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा